अजपा जप आणि शांभवी मुद्रा ऑनलाईन कोर्स : श्वास, मंत्र, मुद्रा आणि ध्यान यांच्या सहाय्याने मनःशांती, एकाग्रता, चक्र संतुलन आणि कुंडलिनी जागृती. अधिक माहिती आणि आगामी तारखांसाठी येथे जा.

गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्र २०२४

सर्व प्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडवा, नूतन वर्ष आणि चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

आपण जसं जसं लहानाचे मोठे होतो तसं तसं आपल्या मनावर कळत नकळत एक गोष्ट बिंबत जाते ती म्हणजे -- आध्यात्मिक प्रगती साधायची असेल तर कोणत्या ना कोणत्या देवी-देवतेची भक्ति करणे आवश्यक आहे. कोणत्या ना कोणत्या देवी-देवतेची साधना-उपासना करणे आवश्यक आहे.

आपल्या मनावर हे एकदा बिंबले गेले की मग आपसूकच ढीगभर देवी-देवतांची स्वरूपे, पूजा-पाठ, कर्मकांड, उपासनेची विधी-विधाने, नीती-नियम, रूढी-प्रथा-परंपरा यांचा एक मोठा डोंगर आपल्यापुढे उभा ठाकतो. त्या पसाऱ्यातून मग आपण आपल्या बुद्धीला पटतील, जूणे-जाणते-अनुभवी लोकं सुचवतील त्या गोष्टी स्वीकारतो. आता या स्वीकारलेल्या उपासना मार्गावरून आपली वाटचाल सुरू झालेली असते. या उपक्रमात आपापल्या कुवती नुसार आपल्याला कमी-अधिक प्रमाणात यश मिळत असते.

खरंतर वरील गोष्टी काही अर्थहीन असतात किंवा कुचकामी असतात असं बिलकुल नाही. जुन्या जाणत्या ऋषी-मुनींनी, साधू-संन्यास्यानी, जाणकारांनी त्या आपापल्या आकलनानुसार सांगितलेल्या असतात. सर्व सामान्य लोकांना आचरणात आणण्यासाठी एक रूपरेखा असावी जेणेकरून त्यांची वाटचाल आखीव-रेखीव आणि शिस्तबद्ध पद्धतीने होईल या भावनेने त्या तयार झालेल्या असतात. त्या नक्कीच उपयोगी असतात परंतु त्यांचे अनुसरण करत असतांना या गोष्टींचा मूळ उद्देश कित्येकदा दुर्लक्षित होतो किंवा विसरला जातो. कित्येकदा तर काळानुसार या गोष्टींत प्रचंड भेसळ किंवा तफावत सुद्धा आढळून येते.

मागच्या एका लेखात आपण चौर्यांशी लक्ष जीवयोनी विषयी जाणून घेतले. क्षणभर विचार करा की झाडे-झुडपे, किडे-मुंगी, पशू-पक्षादी जीव, आसुरी जीव, देवी-देवता आणि मानव यांमध्ये नक्की काय भेद आहे बरं? जर तुम्ही सखोल विचार कराल तर तुम्हाला असे आढळेल की या भिन्न-भिन्न जीव योनीत मूलभूत फरक आहे तो त्यांच्यातील जीवशक्तीचा स्तर, जीवशक्तीचा दर्जा आणि जीवशक्तीची अभिव्यक्ति यांचा. अन्यथा या सर्व योनी पंचतत्वे आणि जीवशक्ती यांच्याच आधाराने बनलेल्या आहेत. योगशास्त्रात या जीवशक्तीलाच प्राण, प्राणशक्ती किंवा प्राणउर्जा असे म्हणतात.

सर्वसाधारण साधक देवी-देवतांची उपासना करतो त्या मागे मूळ कारण असते ते म्हणजे त्याच्याकडे कशाचा तरी अभाव असतो आणि उपासीत देवी-देवता तो अभाव भरून काढेल किंवा निदान तो अभाव भरून काढायला सहाय्य करेल, मार्ग दाखवेल अशी त्याची अपेक्षा असते. विषय समजण्यासाठी दोन टोकाची उदाहरणे घेऊ. समजा प्रवृत्ती मार्गावरील एखाद्या व्यक्तीला गाडी-बंगला वगैरे भौतिक सुखांची आस आहे. आज त्याच्या कडे त्या गोष्टी त्याच्या अपेक्षेनुसार नाहीत आणि हा अभाव भरून काढण्यासाठी मग तो उपासनेच्या माध्यमातून देवाला साकडे घालतो. दूसरा कोणी एक निवृत्ती मार्गावरील व्यक्ति आहे ज्याला भक्ति, पूजा-पाठ, मंत्र, स्तोत्रे, उपासना वगैरे माध्यमांतून आपल्या आराध्य देवतेचे दर्शन-आशीर्वाद प्राप्त करण्याची आस आहे. हा व्यक्ति साधना करतच असतो परंतु त्यांत म्हणावे तसे यश अजून त्याला मिळालेले नसते आणि मग तो देवाकडे अध्यात्मसुखाचा हा अभाव भरून काढण्यासाठी प्रार्थना करतो. थोडक्यात सर्वसाधारण साधकाच्या दृष्टीने बोलायचे झाले तर त्याच्याकडे आजच्या घडीला "काहीतरी" नाही आणि ते "काहीतरी" प्राप्त करण्यासाठी त्याचा उपासना नामक खटाटोप सुरू आहे.

उद्देश कोणताही असो साधकाने हा उपासनेचा जो उपक्रम सुरू केलेला आहे त्यात त्याला यश मिळणे अथवा न मिळणे कशावर बरं अवलंबून असते? या पूर्वी काही लेखांतून आपण प्रारब्ध, पुरुषार्थ, गुरुकृपा अशी काही कारणे जाणून घेतली आहेत. परंतु अजून एक कारणही महत्वाचे आहे ते म्हणजे उपासित देवी-देवता आणि साधक यांमधील प्राणशक्तीच्या "ट्यूनिंग" चा अभाव. हजारो-लाखों साधक मंत्र रटत असतात, स्तोत्र घोकत असतात, पूजा-पाठ, होम-हवन करत असतात पण त्यांतील ज्या साधकांचे आपल्या उपासीत देवी-देवते बरोबरचे प्राणशक्तीचे ट्यूनिंग चांगले आहे त्यांना लाभ लवकर आणि कमी कष्टात होतो. बाकीच्या असंख्य साधकांची अध्यातमसुखाची तळमळ शांत होऊ शकत नाही.

साधक आणि उपासीत देवी-देवता यांच्यामधील प्राणशक्तीचे ट्यूनिंग सुधारायचे असेल तर प्रथम साधकाला आपला स्वतःचा प्राणमय कोष सुधारावा लागतो. साधकाचा प्राणमय कोष आणि प्राणशक्तीचे आभामंडल सुधारले की मग आपल्या आराध्य देवी-देवतेशी प्राण ऊर्जेच्या स्तरावर साधक स्वतःला जोडू शकतो. प्राणशक्तीचे महत्व हे असे अनन्यसाधारण आहे. ज्या साधकांना ते कळते त्यांचा आध्यात्मिक उत्कर्ष शीघ्र गतीने होतो. योगशास्त्राचा मूळ सिद्धांतच मुळी आहे -- यथा पिंडे तथा ब्रह्मांडे किंवा पिंडी ते ब्रह्मांडी.

प्राणशक्तीचा स्तर सुधारण्याचे जे काही मार्ग योगशास्त्रात उपलब्ध आहेत त्यांतील एक सुलभ आणि अत्यंत परिणाम कारक मार्ग म्हणजे अजपा जप आणि शांभवी मुद्रा. शंभू महादेवाने दिलेल्या या दोन योग क्रियांचा अंगिकार केला तर मग उपासना मार्ग, साधना मार्ग सुलभ होतो. आपल्या आराध्य देवतेची उपासना करण्यासाठी जे काही मंत्र, स्तोत्र, पूजा-पाठ वगैरे यत्न तुम्ही करत आहात त्यात सफलतेची शक्यता कित्येक पटींनी वाढते. उपासना मार्ग आनंददायी बनतो. शीघ्र फलदायी बनतो. तुम्ही जर कोणत्याच विशिष्ठ देवी-देवतेची उपासना करत नसाल तरी या ध्यान क्रियांचा अभ्यास तुम्हाला "आत्मारामाचा" आशीर्वाद मिळवून देतो. जीव-शिव ऐक्याची अवीट गोडी चाखायला मदत करतो. "मनःशांती" रूपी प्रसाद अलगद तुमच्या पदरात टाकतो.

येऊ घातलेल्या चैत्र नवरात्राकडे केवळ एक उत्सव किंवा पर्व म्हणून न पहाता शरीरस्थ प्राणशक्तीचा जागर, जगदंबा कुंडलिनीचा उत्सव या दृष्टीने पहा असे आवर्जून सांगावेसे वाटते.

असो.

ज्या शंभू महादेवाने मानव पिंडात जगदंबा कुंडलिनीची घटस्थापना केली आहे तो सांब सदाशिव सर्व वाचकांना प्राणशक्तीची उपासना करण्याची प्रेरणा देवो या सदिच्च्छेसह लेखणीला विराम देतो.


लेखक : बिपीन जोशी
बिपीन जोशी हे पंचवीस वर्षांपेक्षा अधिक काळ सॉफ्टवेअर कन्सल्टंट, प्रशिक्षक, लेखक आणि योग-ध्यान मार्गदर्शक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट विषयक अनेक पुस्तके आणि लेख अमेरिका आणि इंग्लंड मधील मान्यवर प्रकाशकांतर्फे प्रसिद्ध झाले आहेत. मायक्रोसाॅफ्ट तर्फे त्यांना मोस्ट व्हॅल्युएबल प्रोफेशनल हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. त्यांनी लिहिलेल्या देवाच्या डाव्या हाती आणि नाथ संकेतींचा दंशु या पुस्तकांची आपली प्रत आजच विकत घ्या. अजपा जप आणि शांभवी मुद्रा ध्यानाच्या ऑनलाईन कोर्स विषयी अधिक माहिती येथे उपलब्ध आहे.

Posted On : 09 April 2024